Friday, May 28, 2010

संभ्रम

काल लेण्यांमध्ये बुद्धाचं एक शिल्प पाहिलं
भव्यच होतं ते - बुद्धाच्या चेहऱ्यावरचं शांत स्मितहास्य,
कुरळे केस, लांब कान, रुंद खांदे,
हाताचे तळवे आणि त्यावरील रेषा,
अंगावरील वस्त्र, या सर्वातून प्रतीत होणारी बुद्धाची विरक्ती.
हे सगळं ते शिल्प दाखवत होतं, भान हरपून बघत राहिलो.

इतर राजे भोगविलासात आणि साम्राज्यवाढीत दंग असताना
लौकिक सामर्थ्य आणि ऐश्वर्याकडे पाठ फिरवून गेलेला सिद्धार्थ.
त्या प्रेरणेपुढे मी नतमस्तक असतानाच एक सुंदर मुलगी समोरून गेली.
अवखळ डोळे, रेखीव बांधा, नितळ हात,
घामाने ओली झालेली मान, त्याला चिकटलेले केस,
नैसर्गिक शिल्पच जणू.

मी मात्र नंतर विचारात - दोन अनुभूतींमुळे.
बुद्धाबद्दल आणि कलाकाराबद्दल वाटत असलेला आदर, बुद्धाच्या विरक्तीचा (अंशत:) प्रभाव.
आणि त्याचवेळी निसर्गाच्या जीवशास्त्रीय सत्याचे आणि मुलभूत प्रेरणेचे दर्शन.
विरक्ती आणि भोग या दोन टोकांच्या मध्ये मी.

Thursday, May 27, 2010

रब्बी शेरगिलचं एक गाणं

काहीही प्रस्तावना न करता हे गाणं ऐकावं आणि वाचावं अशी इच्छा आहे. गाणं - युट्युब वर, एम पी थ्री फाईल, आणि शब्द इथे आणि इथे.
गेल्या दोन-तीन posts मध्ये संवेदनशीलतेच्या नावाने बराच ओरडा केला होता. त्यावर उतारा म्हणून हे गाणं.

दोन ऑनलाईन उपक्रमांबद्दल

. शास्त्रीय संगीतातील बंदिशींचे शब्द - बंदिशबेस येथे मिळतील. अद्वैत जोशी यांची ती साईट आहे. शास्त्रीय संगीताच्या श्रोत्याला बंदिशीचे शब्द बऱ्यापैकी वेळेस कळत नाहीत. ते या साईट वर उपलब्ध करून दिलेले आहेत. अजूनही काही विभाग आहेत. पण बंदिशींचे शब्द नेटवर दुर्मिळ आहेत म्हणून फक्त त्याचा उल्लेख केला.

. एक कविता - पद्माकर, हृषिकेश, किरण ही मंडळी २००६ पासून हा ब्लॉग चालवत आहेत. सहजासहजी नेटवर सापडणाऱ्या कविता येथे सापडतील. (काही दिवसापूर्वी मीही त्यांना जोडलो गेलो आहे.)

असे सातत्यपूर्ण उपक्रम चालवल्याबद्दल दोन्ही उपक्रम सुरू करणाऱ्यांचे आणि इतर contributors चे हार्दिक अभिनंदन!

Wednesday, May 26, 2010

शास्त्रीय संगीतातील बदल - व्यापक विचार

एका मित्राने पाठवलं म्हणून धनश्री राय-पंडित यांचं हे व्याख्यान ऐकलं. भारतीय शास्त्रीय संगीताबद्दल तरुण पिढीत जो दुरावा निर्माण होतो त्याची वेगवेगळी कारणे देण्यात येतात. त्यात भारतीय संगीतात तांत्रिक गोष्टी जास्त आहेत म्हणून ते कदाचित समजावून घायला अवघड जातं असंही एक कारण मानलं जातं. या बाईंनी शास्त्रीय संगीतातील राग समजावून घ्यायला काही उपाय सुचवलाय. तो उपाय ऐकून (आणि मुख्यता: त्यामागचा विचार जाणून) मला काही गोष्टी सुचल्या. या लेखातील फक्त दुसरा मुद्दा वर उल्लेखलेल्या व्याख्यानाशी संबंधित आहे. बाकीचे त्या अनुषंगाने सुचलेले विचार.

या आधीही मी शास्त्रीय संगीतातील बदलत्या trends वर लिहिलं होतं. माझे काही समज थोडे अजून व्यापक झाले आहेत असे मला वाटते. त्यामुळे हा लेख लिहायची इच्छा झाली.

१. आक्षेप: भारतीय संगीताचा आत्मा हरवतो आहे - उत्तर : भारतीय संगीत हे जणू काही "दैवी संगीत" आहे आणि त्यामुळे त्यात बदल करण्यात येऊ नयेत असा काही मंडळींचा सूर असतो. नावं घ्यायची गरज नाहीये पण अगदी उत्तम, प्रथितयश आणि मला ज्या कलाकारांबद्दल व्यक्तिश: प्रचंड आदर आहे त्यांच्याकडून हे ऐकल्यावर मात्र हे कलाकार आपल्यापुढे अपूर्ण चित्र उभं करत आहेत असं मला वाटलं.

ख्याल संगीताबद्दलच बोलायचं तर ते जास्तीत जास्त ५०० वर्ष जुने आहे. त्याआधी (त्याला समांतरही) धृपद संगीत होते. त्याचा संदर्भ फार तर तिथून अजून ५००-१००० वर्षे मागे जाईल. लोकसंगीताचा संदर्भ अजून ३-४ हजार वर्षे पर्यंत जाईल. (हे सगळे आकडे अंदाजे टाकतो आहे, माझा मुद्दा मांडण्यात अचूक आकडे फारसे महत्त्वाचे नाहीत). शेतीचा उदयच जिथे २० हजार वर्षापूर्वीपर्यंत झाला नव्हता आणि संस्कृतीचा उदय ४००००/५०००० वर्षापूर्वीपर्यंत झाला नव्हता तिथे शास्त्रीय संगीत हे जणू काही दैवी आहे आणि त्यात बदल होणे शक्यच नाही ही भूमिका मला तरी हास्यास्पद वाटते. आर डी बर्मन सारख्या संगीताला ७० च्या काळातल्या लोकांनी नाके मुरडलेली असणारच. त्यामुळे आज जे (भारतीय ) संगीत आहे ते जणूकाही फारच उथळ आहे असे सरसगट मानणे चुकीचे आहे.

२. भारतीय संगीताचे oversimplification : भारतीय रागसंगीत समजण्यास अवघड आहे असे माझे मत आहे. पण ते गाणे enjoy करण्यासाठी ते समजले पाहिजे असे कुठे आहे? त्यामुळे गाणे ऐकणे आणि ते समजणे या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. या आधीही याबद्दल एक लेख लिहिला आहे त्यामुळे जास्त खोलात जात नाही.

पण enjoy करण्यासाठी गाण्याच्या तांत्रिक बाजू समजण्याची गरज नाही याचा अर्थ तांत्रिक बाजू सोप्या आहेत असे मुळीच नाही. तांत्रिक बाजू समजावून घायला मेहनत घ्यावी लागते हे नि:संशय खरे आहे. त्यामुळे गाण्यातल्या तांत्रिक बाजू समजणे सोपे आहे असे oversimplification मात्र कृपया करू नये.

३. बदलते जीवनमान आणि संगीताचा संबंध : जिथे जीवनमान अस्थिर झाले आहे, लोकांचा उथळपणा वाढतो आहे, भोगवादी प्रवृत्ती वाढते आहे व तिला खतपाणी घालण्यास सर्व घटक तत्परतेने आपली भूमिका बजावत आहेत, तिथे संगीत किंवा कला या गोष्टींवर याचा परिणाम होणार नाही असे शक्य नाही. अगदी अपरिहार्यपणे तो होणार. पण परिणाम संगीतापेक्षा फार मोठ्या गोष्टीवर पडतो आहे आणि ती म्हणजे जीवनमूल्ये.

आजच्या (माझ्या) पिढीत किती लोक passionately काहीतरी करताना दिसतात? ते खेळ, कला, वाचन, ट्रेकिंग यासारखा काहीही असू शकतं. weekend ला timepass म्हणून करणं वेगळं आणि एखाद्या गोष्टीची प्रचंड आवड (passion) असल्यामुळे ती गोष्ट करणं वेगळं. या आधीच्या या post चा रोख या उथळपणावर टीका करणे हाच होता. करमणूक म्हणून काही करूच नये एवढी अतार्किक भूमिका मी घेणार नाही. माझा आक्षेप आहे ते सर्व काही करमणूक म्हणून बघण्याला.

त्यामुळे जर काही हरवत असेलच तर ते भारतीय संगीत एवढंच हरवत नाहीये पण passion /संवेदनशीलता यासारखी महत्वाची मूल्ये हरवत आहेत. भारतीय संगीत बिघडत नाही असं मला म्हणायचं नाही. ते बदलत आहे, त्यातले काही बदल मला रुचत नाहीत. एक श्रोता म्हणून होत असणारे उथळ बदल मला नक्कीच टोचतात, त्रास देतात. पण या पूर्ण बदलांकडे वस्तुनिष्ठ पद्धतीने बघण्यात यावं असं मला वाटतं.