Friday, December 26, 2008

शास्त्रीय संगीत श्रवणातील बदलते trends

बर्याच जणांना माझी ही post आवडणार नाही. कारण त्यामध्ये त्यांच्या शास्त्रीय संगीतातील जी श्रद्धास्थाने आहेत त्यांना धक्का लागू शकतो.

परवाच (मराठी "परवा" - वर्षांपर्यंत मागे जाउ शकतो) पुण्यात शास्त्रीय संगीताचा सवाई गंधर्व महोत्सव झाला. पूर्ण नाही पण बराचसा ऐकला. अगदीच मोजके (२-३) performance माझ्या मनाला भिडले. अगदी गाजलेले म्हणावेत अशा संगीतकारांनीही निराशा केली (किंवा नेहमीच करतात). त्यातून आणि in-general गेल्या काही दिवसांत शास्त्रीय संगीत ऐकण्यात जे बदल मी अनुभवले ते मांडावेसे वाटतात. हे बदल आत्ताच झाले असतील असे नाही पण मला गेल्या २-३ वर्षात प्रकर्षाने जाणवले.

वाद्य किंवा कंठ (vocal) हे एक माध्यम आहे ज्यातून संगीतकार आपले संगीतविचार सांगत असतो. शास्त्रीय संगीताच्या साधनेत दोन गोष्टी आहेत - पहिली माध्यमावरची (किंवा ते वाजवण्याच्या तंत्रावरची) हुकुमत आणि दुसरी स्वतःचे संगीतविचार प्रगल्भ करत जाणं. पहिली गोष्ट जी आहे ती तुलनेने फारशी अवघड नाही. म्हणजे काय, की काही ठराविक वर्षे तंत्राचा रियाज केला की तंत्रावर हुकुमत येऊ शकते. आता ही ठराविक वर्षे कुणासाठी /१०/१५/२०/२५/४० अशी असू शकतात. पण तंत्रावर हुकुमत मिळवणं हे बरंचसं hard work मधून साधु शकतं. पण दुसरी गोष्ट जी आहे - स्वतःचे संगीतविचार प्रगल्भ करत राहणं त्यासाठी मात्र विचारप्रक्रिया सतत चालू ठेवावी लागते, एक उपजत सौंदर्यदृष्टी असावी लागते, प्रतिभा असावी लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण पूर्णत्वाला पोचलेलो नाही आहोत हे भान कायम जागृत असावं लागतं.आता ही दुसरी गोष्ट फक्त hard work ने साधू शकते का? प्रामाणिकपणे सांगायचं तर मला माहीत नाही. पण मला असं वाटतं की अतिउच्च प्रतीचा संगीतकार असेल तर त्यात थोडासा नैसर्गिक देणगीचा भाग असायला लागतो.

एखादा चांगला संगीतकार होण्यासाठी तंत्रावरची हुकुमत तर आवश्यक आहेच पण पुरेशी नाही. कारण संगीतविचार प्रगल्भ नसतील तर नुसत्या तंत्राने संगीत प्रभावी होउ शकत नाही. एखादा राग कुठल्याकुठल्या काव्यरसाशी जोडला जातो, त्याचं स्वरुप कसं आहे, त्याचा स्वभाव कसा आहे - तो राग लाजरा आहे की धीट आहे, धसमुसळा आहे की नाजुक आहे,. त्याचा जीव किती (किंवा तो किती वेळ रंगवता येईल) या सगळ्या गोष्टींवर संगीतकाराला अतिशय मेहनत(विचार) करावी लागते. असाच विचार फक्त राग या गोष्टीवर नसून ताल/गायकी . अनेक गोष्टींवर एकत्रितपणे करावा लागतो. हे लक्षात घेण्याची गोष्ट आहे की हा विचार तंत्राशिवाय केला जाऊ शकतो.

संगीतकार/ साथीदार करत असलेल्या काही चुका
. केवळ फास्ट वाजवणं म्हणजेच चांगल वाजवणं असं समजणं ही पहिली चूक. ते काही वेळ बरं वाटू शकतं पण काही वेळानंतर irritating होतं. यात आजकालचे बहुतेक वाद्य वाजवणारे येतात. अगदी ज्येष्ठ आणि (तथाकथित) लोकप्रिय संगीतकारपण (वाद्यवादक) असं समजतात याचं दु: होतं.
. साथीदार म्हणजे तबलजी/संवादिनी यांनी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ते साथ करत आहेत आणि स्वतःचं कौशल्य दाखवण्याची ही जागा नाही. ते कौशल्य त्यांनी सोलो वादनात दाखवावे. एखाद्या/दुसर्या ठिकाणी तबल्याच्या हरकती चांगल्या वाटू शकतात पण त्या जास्त झाल्यानंतर त्याला मूळ वादक तबलजी यातील हाणामारीचं स्वरूप येतं आणि मूळ रागाचा विचार अगदीच बाजूला पडतो. चांगल्या साथीदारांची उदाहरणं द्यायची झाली तर पुष्कळ आहेत. . अहमदजान थिरकवा साहेब, पं सुरेश तळवळकर, पं अरविंद थत्ते, पं अप्पा जळगावकर ही काही लगेच आठवणारी नावं. हे सर्व अतिशय मोठे कलाकार आहेत पण यांची साथ कुठेही आक्रस्ताळेपणा करता अतिशय संयत असते. यातले तबलेवाले आणि आजकालचे काही इतर leading आणि popular तबलजी आठवून बघा म्हणजे फरक जाणवेल. कधीकधी असंही जाणवतं की वादकाची तयारी कमी असल्यामुळे तो/ती तबलजीला जास्त scope देतात.
. काही वाद्य ही लोकसंगीतातून/ पाश्चात्य पद्धतीतून शास्त्रीय संगीतात आलेली आहेत याचं भान ठेवणं. दरबारी कानडा हा राग संतूरवर ऐकून मी सर्द झालो. हा राग मींडकारी/ आंदोलनातून खुलतो. संतूर या वाद्यावर दोन्ही गोष्टी प्रभावीपणे वाजवणं शक्य नाही, वाजवल्या तरी कानाला गोड वाटत नाही. आता माझ्यासारख्या सामान्य श्रोत्याला ज्या गोष्टी कळतात त्या एवढ्या मोठ्या कलाकाराला कळत नाहीत की कळूनही वळत नाहीत?
. लोकांना आवडेल तसं आपलं गाणं mold करणं. या मुद्द्या वर मुळातून वाद होउ शकतात. पण केवळ लोकांना आवडतं म्हणून एकच आलाप/तान पुन्हापुन्हा गाणं/वाजवणं यानं काय साध्य होतं?

५.एखाद्या व्यक्तीचे गुरू मोठे असतील तर त्या व्यक्ती पण मोठ्या असतील असे नाही. माझे गुरू उस्ताद अमुक किंवा पंडितजी तमुक असा सारखासारखा उल्लेख केल्याने आपण फार मोठे कलाकार होत नाही उलट जाणकारांत आपलं हसू होतं. त्यामुळे गुरूच्या नावाची पुण्याई फार दिवस टिकत नसते याची जाणीव गायक/वादकांनी ठेवावी व आपापल्या संगीतावर प्रामाणिक मेहनत करावी.


श्रोत्यांच्या काही त्रुटी :
. कुठल्याही गोष्टीच्या मुळापर्यंत जायची वृत्ती - अर्थात हे सर्व श्रोत्यांना शक्य नाही पण कमीतकमी संगीताच्या विद्यार्थ्यांनी तरी याकडे गंभीरपणे बघायची गरज आहे. उदा. जो कोणी .रशिद खाँची स्तुती करतो त्याला मी रशिद खाँचे गुरु . निस्सार हुसेन खा साहेब ऐकण्याची शिफारस करतो. निस्सार हुसेन साहेबांची गायकी रशिद खां पेक्षा चांगली आहे त्यांचं गाणं ऐकल्यावर रशिद खाँच्या आजकालच्या गाण्यातील त्रुटी दिसतात. आजकालच्या इंटरनेटच्या युगात तर कुठलीही गोष्ट गुगलली की सापडते. इंटरनेटवर शोध घेतला तर निस्सार हुसेनखाँच्या काही recordings सापडतात, असे असताना फारच कमी जण मूळ आणि दर्जेदार गाण्याचा शोध घेताना दिसतात.

चांगल्या संगीत समीक्षकांची कमतरता :
. उठसूट कुठल्याही गाण्याला बहारदार/रंगतदार म्हटलं की त्या शब्दांना मोल रहात नाही. एखादं गाणं खराब झालं तर लिहा नं ते खराब झालं म्हणून. या वेळेस तर जवळपास सगळ्या newspapers मधे मला हे जाणवलं. मी एकदा अतिशय भिकारी गाण्याचं वर्णन बहारदार असं वाचलं आणि पुढचं परीक्षण वाचायचंच सोडून दिलं. अर्थात यात दोष रिपोर्ट लिहीणार्यांचा नसून तो newspapers चा आहे आणि कदाचित त्यांचाही नसेल कारण त्यांनाही त्यांना परवडणार्या rate मधे चांगलं समीक्षक मिळत नसेल.

या गोष्टींमुळे जो नवखा श्रोता असतो तो चुकीच्या गोष्टींना शास्त्रीय संगीत समजतो किंवा पळुन तरी जातो. change is the only constant thing असं म्हणतात. त्या न्यायाने सध्या जे शास्त्रीय संगीत आहे ते पण कुठल्यातरी बदलातून आलेलं आहे आणि ते यापुढेपण बदलत राहणार. फक्त बदल करणार्‍यांनी (किंवा आम्ही बदल करतो असं म्हणणार्‍यांनी) स्वतःच्या कुवतीचा अंदाज घ्यावा आणि मग बदल करावेत.

Wednesday, December 17, 2008

तुकाराम

सध्या तुकाराम वाचतोय. मी नास्तिकतेकडे वाटचाल करणारा माणूस आहे याचा मागे उल्लेख केलेला आहे. तरीही संतवाङ्मय हा माझ्या interest चा विषय आहे. एखाद्या गोष्टीवर श्रद्धा असणं आणि धार्मिक (किंवा आस्तिक) असणं यांचा काहीही संबंध नाही हे बर्‍याच मोठ्या लोकांनी सांगितलेले आहे आणि ते मी स्वतः पण अनुभवतो. त्यामुळे मी कुठलीही धार्मिक श्रद्धा न बाळगता संत साहित्य वाचतो व ते enjoy पण करू शकतो. संतांच्या उत्कट आणि आत्यंतिक प्रामाणिक भावना, त्यांची समाजसुधारणेची तळमळ, सरस काव्य या गोष्टींमुळे संतसाहित्याबद्दलची भीती (भाषेची आणि उपदेश ऐकण्याची) कमी झाली आणि ते साहित्य वाचायची आवड निर्माण झाली.

समग्र ग्रंथांमध्ये (स्फुट अभंग किंवा अभंगाचे निरूपण सोडून) याआधी ज्ञानेश्वरी वाचायचा प्रयत्न केला होता पण ज्ञानेश्वरी झेपली नाही. आपली अजून ज्ञानेश्वरी वाचायची maturity आलेली नाही हे जाणवलं आणि ज्ञानेश्वरी काही काळासाठी बाजूला ठेवलीये. माझ्या एका ज्येष्ठ मित्राने मला तुकाराम वाच असं recommend केलं. म्हणून तुकाराम गाथा (निवडक अभंगांची - अर्थाशिवाय सं. भालचंद्र नेमाडे, प्र. साहित्य अकादमी ) घेतली, वाचायला सुरूवात केली आणि बाकीच्या संतांपेक्षा तुकारामाच्य कवितेतलं वेगळेपण लक्षात आलं ( असं प्रत्येकसंतकवीचं काहीतरी वैशिष्ठ्य असेलच ) आणि तुकारामाचा कवी किंवा बंडखोर म्हणून मोठेपणा जाणवायला सुरूवात झाली. अर्थाशिवायची गाथा वाचतोय त्यामुळे त्यातील अभंगाचा अर्थ लावण्यात आणि तो समजण्यात मजा येते.

ज्ञानेश्वरी वाचताना कायम आपण तत्त्वज्ञान वाचत आहोत हे जाणवत राहतं. तुकाराम वाचताना सोप्या भाषेमुळे (काळाचा फरक?), त्यातील प्रामाणिक अनुभवकथनामुळे अभंगातील तत्वज्ञानाचं ओझं जाणवत नाही. त्यामुळे तुकारामाचे अभंग समजायला सोपे व अर्थवाही झाले आहेत. वाचताना लक्षात येतंय की मराठीतील अनेक म्हणी, अनेक वाक्यप्रचार, अभंगातल्या स्फुट ओव्या ज्या सुविचार म्हणून वापरल्या जातात हे सर्व तुकारामाची मराठी भाषेला अतिशय मोलाची देणगी आहे. उदाहरण द्यायचं झालं तर - बोलाचीच कढी बोलाचाच भात, गाजराची पुंगी (पूर्ण म्हण नाही तर फक्त concept), कानडीने केला मराठी भ्रतार, एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ, इत्यादी. मला वाटतं (की कुठं वाचलेलं आहे कुणास ठाऊक) - "सत्य असत्यासी मन केले ग्वाही| मानियले नाही बहुमता|| " हा तुकारामाच्या कवितेचा पर्यायाने अनुभवांचा पाया आहे आणि त्यातूनच तुकारामाची बंडखोरी प्रवृत्ती दिसून येते.

तुकारामाच्या कवितेचं आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे त्या कवितेतून आपल्याला तुकारामाचा अध्यात्मिक (धार्मिक नाही) प्रवास दिसतो. सुरूवातीला संसाराच्या ओझ्याने वाकलेला व यातून मला सोडव अशी विनवणी करणारा, या दु:खामुळे विरक्ती आलेला, विरक्तीतून भक्तीकडे वाटचाल करत असलेला आणि भक्तीतून आत्मज्ञानाकडे पोचलेला तुकाराम आपल्याला दिसतो. त्यामुळे त्याचं लोकोत्तरपण तर दिसतंच पण तो प्रवास सामान्यत्वातून असामान्यत्वाकडे होणारा असल्यामुळे जास्त सुंदर वाटतो. त्यामुळे सुरुवातीला बायकापोरे शिव्या देतात, देणेकरी दारात ठाण मांडून बसले आहेत अशी वर्णनं करणारा तुकाराम "आपुले मरण पाहिले म्या डोळा", "याचसाठी केला होता अट्टहास" किंवा "तुका आकाशाएवढा" अशा रचना करतो त्यावेळेस त्या प्रवासाने मी आश्चर्यचकित होतो. व हे आश्चर्य मला त्या प्रवासाबद्दल आणखी विचार करायला भाग पाडतं.

हे वाचताना जाणवलेली अजून एक गोष्ट - आपल्याकडील संताना देवपण देण्याची वृत्ती व चमत्कार व दंतकथांमधेच रमून जायची वृत्ती. तुकाराम हा समाजसुधारक आहे याच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणे व तुकारामाला फक्त एका भक्ताचं रूप देणे. जो तुकाराम भक्तीचे एवढे सुंदर अभंग लिहीतो तोच तुकाराम "माझे लेखी देव मेला | असो त्याला असेल|| " किंवा "आहे ऐसा देव वदवावी वाणी| नाही ऐसे मनी अनुभवावा||" हे लिहीतो हे आपण सोयीस्करपणे विसरुन जातो. तुकारामाचे अभंग इंद्रायणीतून वर येतात ही घटना किंवा तुकाराम सदेह वैकुंठाला जातो ही घटना मला एकतर रुपक वाटतात किंवा थोतांड वाटतात. पण जरा आजूबाजूला पाहिलं तर याच घटनेला जास्त महत्त्व दिलं जातंय असं दिसतं.

मागील काही articles मधे पण मला न झेपणार्‍या गोष्टींबद्दल मी लिहीतोय याची मला जाणीव आहे पण एखादी गोष्ट वाचल्यानंतर/ अनुभवल्यानंतर त्याबद्दलचे विचार मी लिहीत आलेलो आहे. वास्तविक तुकाराम ही काय माझ्यासारख्या माणसाने लिहायची गोष्ट आहे? जिथे म वा धोंड, नेमाडे, चित्रे यासारख्या लोकांनी लिहून ठेवलंय तिथे मी त्याबद्दल लिहीणं म्हणजे खरंतर न झेपणारी गोष्ट आहे. कदाचित इथून पुढेही अशाच एखाद्या /अनेक अशा गोष्टींवर लिहील. त्यावेळेस पुनुरुक्ती नको म्हणून हा परिछेद लिहीला.

Sunday, September 14, 2008

'बखर बिम्मची', 'वनवास' आणि 'शाळा'

बखर बिम्मची - जी. . कुलकर्णी
वनवास - प्रकाश नारायण संत
शाळा - मिलींद बोकील

यातल्या प्रत्येक पुस्तकाबद्दल वेगळा लेख होऊ शकतो. त्यातील शाळा बर्याच जणांनी वाचलेलं असेल. वनवास वाचणाऱ्यांची संख्या त्यापेक्षा थोडी कमी भरेल आणि (माझ्या माहितीप्रमाणे) बखर बिम्मची फारशा लोकांनी वाचलं नसेल. मी वनवास वाचून संपवलं आणि या तीन पुस्तकांना बांधणारा समान दुवा लक्षात आला. तीनही पुस्तके अतिशय सुंदर असून एकदा हातात घेतल्यावर पूर्ण केल्याशिवाय खाली ठेववत नाहीत. या तीन पुस्तकातील समान गोष्टींआधी (ज्यांनी वाचली नसतील) त्यांच्यासाठी थोडासा पुस्तक परीचय. हा परिचय अतिशय लहान असल्यामुळे पुस्तकाची अनेक वैशिष्ठे त्यात जाणवणार नाहीत त्यामुळे या परिचयावरून पुस्तकाविषयी ग्रह करुन घेऊ नये.

बखर बिम्मची : बिम्म हा - वर्षांचा मुलगा आहे. अजुन शाळेत जायला सुरूवात झाली नाही. बब्बी (मोठी बहीण) शाळेत जाते म्हणून ती बिम्मसमोर थोडा शिष्टपणा दाखवते. बिम्मचे बाबा बाहेरगावी नोकरीला आहेत. त्यामुळे बब्बीसोबत खेळणं (किंवा भांडणं), तिच्यासोबत बरोबरी करणं आणि आईला आपल्या खोड्यांनी वैतागून सोडणं हा बिम्मचा प्रमुख दिनक्रम. यातील बहुतेक खोड्या या खोड्या नसून बिम्मच्या बालबुद्धीला पडणारे निरागस प्रश्न आहेत आणि आईलाही ते जाणवतं. त्या (बहुतांशी) निरागस खोड्या आपल्याला बिम्मच्या जास्तच जवळ आणतात. बिम्म मधील प्रत्येक गोष्ट आपल्याला आपल्या लहानपणीच्या मनात असलेल्या fantasy ची आठवण करुन देते. हळूहळू आपण पण बिम्मच्या विश्वात प्रवेश करतो. जीए आपल्या असाधारण कथांसाठी प्रसिद्ध आहेत. एवढ्या complex कथा लिहीणारे जीए बिम्म सारखं हळूवार लिहू शकतात हा माझ्यासाठी आश्चर्याचा धक्का होता.

जर मी बिम्म कोणाला वाचायला दिलं आणि त्यानं भारावून जाउन बखर बिम्मची बद्दल बोलला नाही तर मला जाणवतं की त्या व्यक्तीची माझी wavelength थोडीशी वेगळी आहे. त्यातल्या त्यात ज्यांचं बालपण निमशहरी भागात गेलेलं आहे अशांना तर बखर बिम्मची अगदी nostalgic बनवतं. लहानपणी आपल्याला काही प्रश्न पडतात, त्याची उत्तरं शोधण्यासाठी आपण काही fantasies चा विचार करतो. मोठं झाल्यावर अर्थातच त्या प्रश्नांची उत्तरं सापडतात पण त्यातील सौंदर्य हरवतं. जी. ए. बिम्मच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा एकदा हरवलेल्या fantasies मिळवून देतात.

वनवास : लंपन नावाच्या एका मुलावरचं पुस्तक. लंपन साधारण ११-१२ वयाचा आहे. प्रकाश नारायण संतांनी लंपनच्या भावविश्वावर चार पुस्तकं लिहीली आहेत. त्यातलं हे पहिलं. बाकीची तीनही वाचायची आहेत. तर लंपन हा आपल्या आजी-आजोबांकडे राहात आहे. बिम्मप्रमाणे लंपनलाही काही भन्नाट प्रश्न पडतात पण fantasies ऐवजी तो प्रश्नांची उत्तरं शोधायला आजूबाजूच्या लोकांची (आजी, आजोबा, सुमी नावाची मैत्रीण, .) मदत घेतो किंवा स्वतःचं काहीतरी भन्नाट logic लावतो. मुलींविषयी वाटणारं आकर्षण प्रकाश नारायण संतांनी सुमीसोबतच्या प्रसंगांच्या माध्यमातून फारच सुंदर रितीनं व्यक्त केलंय.

शाळा : मिलींद बोकीलांची ही कादंबरी एका नववीतल्या मुलाचं (मुकुंद) भावचित्रण आहे. लंपन आणि बिम्म हे आपल्यापुढे कथास्वरूपात उलगडत जातात तर शाळाचा form कादंबरीचा आहे. त्याचा plot आहे तो शाळेत आणि शाळेच्या भोवती घडणार्या घटनांचा. सुरूवात होते ते मुकुंदचं नववीचं वर्ष सुरू होण्यापासून. स्वतःची वेगळी ओळख (distinct identity) निर्माण होण्याच्या हा काळ. या कादंबरीतील गाव आणि काळ दुर्लक्षित करुन प्रत्येक मुलाचा या काळातील भावनांचा घटनांचा आलेख बघितला तर मला वाटतं त्यांचा मसावि (महत्तम सामायिक विभाजक) शाळा मधे सापडेल (ही बाब ७०-८०% मुलांसाठी खरी ठरेल. उरलेले त्यांच्या respective वयात अतिसज्जन किंवा अतिवाह्यात या category मधे मोडतील).

ही तीनही पुस्तकं आपल्याला त्या-त्या वयातल्या भावविश्वाची सफर घडवून आणतात. ही पुस्तकं साधी असली तरी अशी पुस्तकं लिहीणं सोपं निश्चीतच नाही. ललित साहित्य हे अनुभवांवर आधारलेलं साहित्य आहे. या वयांतील भावना कुणाच्या उसन्या घेऊन या पुस्तकांसारखं ललित साहित्य लिहीणं अशक्य आहे. अशी पुस्तकं लिहीण्यासाठी त्या वयातील भावनांचा एक कोपरा मनात कायम असायला लागतो. कितीही मोठं झालं तरी तो कोपरा विसरून चालत नाही.वरवर जरी सोपी कथा / कादंबरी वाटली तरी केवळ अत्युच्च प्रतिभेचे लेखकच असं लिहू शकतात आणि त्या लिखाणासाठी तेवढ्याच अभ्यासाची जोड असावी लागते. बिम्म आणि शाळा एकापेक्षा जास्त वेळेस वाचलेलं आहे. पहिल्या वेळेस वाचताना त्यातील कथा आवडली व नंतरच्या वाचनात त्यातील साहित्यीक पैलू समोर येत गेले.

लंपनचं सुमीबद्दच्या वागणं किंवा मुकुंदच्या शिरोडकर नावाच्या मुलीबद्दलच्या भावना या त्या वयातील लैंगितकेचा एक सुंदर पैलु आपल्यापुढे मांडतात - ज्याविषयी मराठी साहित्यात जास्त लिहीलं किंवा बोललं गेलेलं नाही. विशेषतः शाळा या बाबतीत जास्त सरस आहे. माझ्या मते लंपन हा थोडा मोठेपणीचा बिम्म आहे आणि मुकुंद हा थोडा आणखी मोठा झाल्यानंतरचा शहरी (मुंबईकर) लंपन आहे. अजून थोडासा विचार केला तर असं वाटलं की ही पुस्तकं फक्त nostalgic बनवत नाहीत तर आपल्याला त्या-त्या वयातील मुलांची भावावस्था समजावून सांगतात. त्यामुळे ज्यांनी ही पुस्तकं ज्यांनी वाचलीत ते लोक आपल्या मुला-मुलींना जास्त चांगलं समजावून घेऊ शकतील - विशेषतः teenage मुलांच्या लैंगिक भावना - ज्याबद्दल आजही जास्त मोकळेपणाने बोललं जात नाही.

अजून एक - जिथे आजूबाजूला सगळीकडूनच भडकतेचा मारा चालू आहे - मग ते साहित्य असो की अजून काही, यातील हळूवार भावना कुठेतरी आपल्यातलं माणूसपण जिवंत ठेवतात असं मला वाटतं.

Wednesday, August 27, 2008

रंजिश ही सही...

एक अजरामर गझल....

गझल म्हणजे रडत बसणं ही माझी आधीची समजूत. त्यामुळे आणि उर्दू समजण्याचा ताण वाटल्यामुळे मी गझलचे शब्द पूर्ण ignore करून त्यातल्या गायकीसाठी गझल ऐकायचो. त्यामुळे माझे आवडते गझल गायक पण मेहंदी हसन आणि बेगम अख्तर आहेत. ६-७ वर्षांपूर्वी रंजिश ऐकण्यात आली आणि खूपच आवडली पण अर्थ समजून घेण्याच्या भानगडीत पडलो नव्हतो. IIT मध्ये असताना अनिकेतने एकदा त्याचा अर्थ असलेली link forward केली आणि रंजिश चे शब्द आणि अर्थ पण प्रचंड आवडला.

मुळात ही एक देवदास मनोवृत्तीची गझल. मला देवदास मनोवृत्तीचा मनापासून राग. देवदास आणि देवदास मनोवृत्तीचे लो़कं म्हणजे पळपुटे हे समीकरण मनात नक्की बसलेलं.परिस्थितीशी सामना न करता जुन्या आठवणींचा गहिवर काढत रडत बसणं हाच यांचा धर्म. मग नशिबाला दोष देत दारु किंवा तत्सम गोष्टींचे व्यसन लावून हे कायम रडण्याचं दळण दळत बसलेले. ही माझी देवदास लोकांबद्दलची समजूत. माझ्या स्वःतच्या philosophy नुसार खरं तर मला रंजिश आवडायला नव्हती पाहिजे. पण रंजिशचा अर्थ कळाल्यानंतर का कोण जाणे मला रंजिश प्रचंड आवडली. त्यातल्या मनोवृत्तीचा तिटकारा नाही आला. पहिल्यांदाच देवदास कुठेतरी थोडासा समजतोय असं वाटायला लागलं. अजूनही देवदास आणि त्या category मधले लोक आवडत नाहीतच पण प्रेमभंग/कायमचा विरह झाल्यानंतर प्रत्येकजण या अवस्थेतून अगदी थोड्या काळासाठी का होईना पण जातोच अशी जाणीव झाली आणि म्हणूनच याच्याशी संबंधित भावभावना कितीही practical/ideal जरी असल्या तरी रंजिश ही गझल त्याचं एक मानवी स्वरूप वाटलं. रंजिश ही गझल प्रेमातलं किंवा आकर्षणातलं उदात्त रूपाबरोबरच त्याचं मानवी स्वरूप पण मांडते आणि म्हणूनच ती जास्त सुंदर वाटते असं मला वाटतं.

मेहंदी हसन यांनी रंजिश जशी गायलीय त्याला तोड नाही. त्यावर किंवा रंजिश च्या musical composition वर एक वेगळा लेख होऊ शकेल. पण आज अहमद फराज (रंजिश चे शायर) गेल्याची बातमी वाचली आणि त्यांना लेखातून श्रद्धांजली वाहावी असं वाटलं. अहमद फराज यांना माझी श्रद्धांजली.

Tuesday, August 19, 2008

शास्त्रीय संगीतातील शास्त्र आणि श्रवण

शास्त्रीय संगीत ऐकण्याबद्दलचा एक फार मोठा गैरसमज म्हणजे ते ऐकण्यासाठी गाण्याचं शास्त्र समजावं लागते. आधीच्या post मध्ये गाणं ऐकण्याचे analytical mode आणि pleasure mode असे दोन modes सांगितले होते. याचाच दुसरा अर्थ आहे की गाणं कुठल्या mode मध्ये ऐकायचं हा सर्वस्वी तुमचा choice आहे. त्यात उच्चनीच असं काही नाही. शेवटी शास्त्रीय संगीतातील शास्त्र म्हणजे तरी काय आहे?

जेव्हाकेव्हा शास्त्रीय संगीतातील शास्त्र तयार झालं नव्हतं (किंवा जेव्हा फक्त लोकसंगीत अस्तित्वात होतं) , तेव्हाच्या संगीतकारांना संगीतातील काही गोष्टींना, काही नियमांना किंवा काही आकृतीबंधांना (patterns) मूर्तरूप (formal models) द्यावंसं वाटंलं. ते त्यांनी राग किंवा तत्सम संज्ञांच्या (स्वर, कोमल/तीव्र/शुद्ध स्वर, आरोह, अवरोह, इ.) स्वरूपात मांडलं. (काळाच्या रेषेवर) त्यानंतरच्या संगीतकारांनी तीच मूर्तरूपं वापरणं चालू ठेवलं. याचं अगदी साधं कारण म्हणजे ती models बर्‍यापैकी परिपक्व होती/होत गेली आणि त्यांना आधी formalize केलेल्या गोष्टी पुन्हा formalize करण्यात वेळ दवडण्यापेक्षा ( re-inventing the wheel) संगीतातील काही दुसर्या गोष्टींवर (नवीन राग, गाण्याच्या नवीन शैली, .) लक्ष केंद्रित करावंसं वाटलं. त्यामुळे तीच formal models पुढे वापरण्यात येत गेली आणि विकसत गेली. आता, ज्या लोकांना ही models समजून घेण्यापेक्षा स्वतःची अमूर्त रुपं वापरायची (abstract models) आहेत ते ती खुशाल वापरू शकतात. श्रवणाच्या आनंदाचा गाण्याच्या तांत्रिक बाबींशी संबंध नाही तो याच कारणासाठी. त्यामुळे पारंपारिक चालत आलेले formal models असू द्या किंवा स्वतः develop केलेले अमूर्त models असू द्यात, त्यामुळे श्रवणाच्या आनंदात बाधा यायचं मुळीच कारण नाही. उदाहरणार्थ, भूपाचे स्वर ऐकल्यावर एखाद्याला भूप राग त्यातील शास्त्र समजेल तर दुसर्या कोणाला त्यातलं शास्त्र समजून घेताही स्वतःच्या भावभावनांशी link करता येईल (जो की गाण्याचा एक हेतू आहे). पुलंनी एका ठिकाणी म्हटल्याप्रमाणे शास्त्रीय संगीत म्हणजे फक्त त्या रागातील स्वरांच्या रचना (permutations) नव्हेत तर त्यातील भाव जास्त महत्त्वाचा आहे. म्हणूनच जे लोक गाण्यातील फक्त गणित किंवा शास्त्र बघतात ते लोकच ऐकण्यासाठी गाणं "समजलं" पाहिजे या गोष्टीचा पुरस्कार करतात.

पुस्तक परिचय : बारोमास - सदानंद देशमुख

आपण बर्‍याच गोष्टी आपल्याला सोयीस्कर पडतील अशा गृहीत धरतो. मग कधीतरी एखादा अनुभव असा येतो किंवा असं काहीतरी वाचण्यात येतं की ती गृहीतके पूर्णपणे मोडून पडतात व वस्तुस्थिती लक्षात येउन परिस्थितीचा पूर्ण विचार करणं आवश्यक बनतं. सध्या आपण शेतकर्‍यांचं जगणं असंच गृहीत धरुन चाललो आहोत. पेपरमध्ये शेतकर्‍यांच्या आत्महत्येची बातमी वाचली की थोडा वेळ हळहळ वाटून आपण कामाला लागतो. कर्जबाजारीपणा हेच शेतकर्‍यांच्या आत्महत्याचं कारण आहे असं प्रसारमाध्यमं भासवतात. पण हा कर्जबाजारीपणा का आला आहे याचं बारोमास इतकं अचूक चित्रण मला तरी कुठल्या लिखाणात आढळलं नाही. (कदाचित माझं वाचन कमी असेल, पण त्यामुळे बारोमासचं महत्व कमी होत नाही.)

बारोमास वरवर पाहता एक कादंबरी आहे. पण नीट विचार केला तर बारोमास फक्त ललित अनुभव मांडणारी कादंबरी न ठरता सध्याच्या शेतीविषयक प्रश्नावर भाष्य करणारं पुस्तक आहे. शेती, शेतीचे सध्याचे स्वरूप व त्यातील डोंगराएवढ्या अडचणी निस्तरता निस्तरता होणारी शेतकर्‍याची होणारी दमछाक देशमुखांनी एका सुशिक्षीत तरुणाच्या व त्याच्या कुटुंबियाच्या माध्यमातून मांडली आहे.

एकनाथ हा एक सुशिक्षीत तरुण. पण नोकरीसाठी लाच देउ न शकल्याने तो आपला वडिलोपार्जित धंदा - शेती करु लागतो. या शेतीला पार्श्वभूमी आहे ती जागतिकीकरणानंतरच्या बदललेल्या सामाजिक परिस्थितीची. नोकरीतून मिळणारं स्थैर्य व सुखासीनता शेतीमध्ये मिळू शकत नसल्याने त्याची व त्याच्या कुटुंबाची होणारी घुसमट, कुठेच मार्ग दिसत नसल्यामुळे अंधश्रद्धकडे होणारी वाटचाल, आर्थिक स्थैर्याच्या अभावामुळे भावाभावात बिघडलेले संबंध व विस्कटलेली वैवाहिक नाती, नोकरीसाठीच्या असहायतेचा फायदा घेउन पैसे घेणारे व फसवणारे नोकरीचे दलाल,या परिस्थितीचा राजकीय फायदा घेणारे नेते आणि या सगळ्या गोष्टींचा परस्परसंबंध देशमुखांनी फार चांगल्या पद्धतीनं मांडला आहे.

शेतकर्‍यांची vote bank सर्वच राजकीय नेत्यांनी गृहीत धरल्यामुळे जागतिकीकरणानंतर आवश्यक असलेले policy मधील बदल केले गेले नाहीत. ( जागतिकीकरणानंतर - हे माझं आधीचं मत होतं. अरूण देशपांडे यांच्या अंकोली येथील प्रकल्पाला भेट दिल्यानंतर समजलं की या policies शेतकर्‍यांना favourable कधीच नव्हत्या. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून - संदर्भ : महात्मा फुले व पंजाबराव देशमुखांचं लिखाण). या policies च्या अभावामुळं शेतकर्‍यांना मोठा तोटा सोसून आपला माल विकावा लागतोय. व त्याचं फलित म्हणजे शेतकर्‍यांचं खालावलेलं राहणीमान, मुलभूत सुविधांचा अभाव, विकासाच्या संधीचा अभाव. या सगळ्या गोष्टी आणि सोबतच निसर्गाची अवकृपा यांचा एकत्रित परिणाम म्हणून शेतकर्‍यांची परिस्थिती दिवसेदिवस बिघडतच जातेय. लेखकाने प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणं ही परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारनं वरवरची मलमपट्टी न करता कायमस्वरूपी उपाय केले तरंच चित्र थोडंफार बदलण्याची शक्यता आहे.

एकंदरीत बारोमास हे एक अस्वस्थ करणारं पुस्तक आहे. सदानंद देशमुखांना या पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा २००४ सालचा पुरस्कार मिळालेला आहे.

disclaimer :
पुस्तकाच्या विषयावरूनच लक्षात आलं असेल की हा एक खूप मोठा विषय आहे. शेती, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, जागतिकीकरण या विषयांचा सखोल अभ्यास केल्याशिवाय त्यावर प्रभुत्वानं लिहीणं शक्य नाही. माझ्या या लेखाचा हेतू शेती किंवा तत्सम विषयावर भाष्य करणं हा नसून असं भाष्य करणार्‍या एका चांगल्या पुस्तकाचा परिचय करुन देणे हा आहे. पण हे पुस्तक वाचल्यावर मलातरी या विषयाचा जास्त अभ्यास (theoritical/practical) करावा असं वाटलं म्हणून हा लेख लिहीला आहे. आधीच्या post मध्ये नमूद (mention) केल्याप्रमाणे टीका व सूचनांचे स्वागत. तपशीलातील चुका असतील तर अवश्य कळवा.

Sunday, June 22, 2008

Stages of listening

मागच्या पोस्ट मधे गाणे ऐकण्याच्या modes बद्दल लिहीले होते. तसेच माझ्यामते गाणे ऐकण्याच्या तीन stages/ पायऱ्या आहेत. पहिली पायरी - गाणं आवडणं आणि त्यातील technicalities न कळता/माहीत नसतानाही गाण्यातला भाव तुमच्यापर्यंत पोचणे.उदाहरणार्थ गीतरामायणाचे संगीत हे पूर्णपणे रागसंगीतावर आधारलेले आहे. पण गीतरामायण ऐकताना त्यातील technicalities समजून घ्यायची मुळीच गरज भासत नाही. दुसरे उदाहरण म्हणून किशोरी आमोणकरांची 'सहेला रे' ही बंदिश घेऊ या. त्यातील राग भूप आहे की भूपाचा variant आहे हे समजून घेण्याची गरज भासत नाही. त्याशिवायही तो enjoy करता येतो.
दुसरी पायरी - गाण्याच्या तांत्रिक बाबी समजून गाणे enjoy करणे. यामध्ये मी analytical pleasure मध्ये सांगितलेल्या बहुतेक बाबी येतात. शास्त्रीय संगीत ऐकणाऱ्या / समजणाऱ्या काही व्यक्ती या तांत्रिक बाबींमुळे शास्त्रीय संगीतच सर्वश्रेष्ठ आहे असे मानू लागतात. इथे शास्त्रीय संगीत great नाही असे मला म्हणावयाचे नाही. शास्त्रीय संगीतासाठी लागणारी साधना आणि बुद्धिमत्ता ही सोपी गोष्ट नाही. पण त्यामुळे शास्रीय संगीतच सर्वात श्रेष्ठ आणि बाकीचे संगीत कमी दर्जाचे हा विचार मला मान्य नाही. सांगायचा मुद्दा हा की तांत्रिक बाबी कळू लागल्या की त्यातच गुंतून पडून त्यातील गाणे ऐकणे किंवा गाणे enjoy करणे हे बाजूला पडून फक्त तांत्रिक बाबींची चिरफाड करत राहणे हा धोका आहे.
तिसरी पायरी - ही सर्वात वरची आणि अवघड पायरी. गाण्याच्या तांत्रिक बाबी माहीत असूनही तांत्रिक बाबींवर लक्ष केंद्रित न होऊ देता त्यातील भाव या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे. या पायरीवर पोचल्यावर शास्रीय / अशास्रीय / उपशास्रीय हा भेदच मुळी राहत नाही. उरते ते फक्त शुद्ध गाणे. ही पायरीच मुळी वेगळी आहे. आधी गाण्याचा वापर आनंद घेण्यासाठी होत असतो. यामध्ये तो स्वतःचा शोध किंवा तत्सम तत्त्वज्ञानाशी निगडीत विचारांसाठी माध्यम म्हणून होतो. सूर, ताल, लय ही बंधने असूनही ती गळून पडतात. मला वाटतं इथे पोचणारे लोक हे एका अर्थाने योगाची साधना करत असतात आणि ही पायरी म्हणजे त्या साधनेचे फळ आहे. संगीताच्या व्याख्येत असलेला नादब्रम्ह या शब्दाचा अर्थ इथे कदाचित उलगडत असेल. इथे श्रोता किंवा गायक यापैकी कुठल्या भूमिकेत साधक आहे याने फारसा फरक पडत असेल असे मला वाटत नाही.
या ठिकाणी मला कबीराची आठवण होते. मंगेश पाडगावकरांनी त्यांच्या कबीर या पुस्तकाच्या प्रस्तावनेत कबीराच्या कवितेच्या अवस्था सांगितल्या आहेत. त्यात कबीराच्या सुरुवातीच्या रचना या 'मला चांगलं बनायचंय' किंवा 'मला वाईट गोष्टींपासून दूर रहायचंय' या भावनेशी साधर्म्य सांगणाऱ्या आहेत (उदाहरणार्थ - माया महा ठगनी हम जानी, हिरना समझ बूझ). पण त्याच्या नंतरच्या/शेवटीच्या काळातल्या रचना या परमतत्वाचा साक्षात्कार झाल्यानंतरच्या म्हणजेच आप/ पर असं काही नाहीच, ज्यापासून पळून जायचंय असं काहीच नाही, ज्याला अंगीकृत करायचंय असंही काही नाही अशा स्वरूपाच्या आहेत . या रचनेचे एक उदाहरण म्हणून 'साधो सहज समाधी भली' ही कविता बघता येईल. तर गाणं ऐकणे किंवा शिकणे यामधली तिसरी पायरीची तुलना याच्याशी करता येईल.
वरील उताऱ्याची ( तिसरी पायरी) अवस्था लहान तोंडी मोठा घास अशी झालीय. पण जे वाटत गेलं तसं ते लिहीत गेलो.

Friday, June 20, 2008

Dedicated listening

मला गाणं गुणगुणण्याची सवय आहे. अगदी शास्त्रीय संगीत ते 'अटरिया पे लूटन कबुतर रे' किंवा 'बिडी जलाय ले' इथपर्यंतची गाणी मी गुणगुणत असतो. अर्थात शास्त्रीय किंवा दर्जेदार (जुने मराठी/ हिंदी, नाट्यसंगीत, गझल) संगीतच जास्त ऐकत असल्यामुळे तेच जास्त वेळेस गातो हा भाग वेगळा. सांगायचा मुळ मुद्दा असा की गाणे गाताना/गुणगुणताना कुणी नवीन माणूस आजुबाजुला असेल तर तो/ती हमखास विचारतातच - 'तू गाणं शिकलेला आहेस काय' किंवा 'तू गाणं गातोस वाटतं'. मग मी त्यांना उत्तर देतो की - ' मी गायक नाही. शास्त्रीय संगीताची थोडीशी ओळख आहे. मी मुळात एक पूर्णवेळ श्रोता (dedicated listener) आहे'. त्यावर हमखास थोडासा प्रश्नार्थक चेहरा किंवा 'विचीत्रच असतात लोक! ' असे expression उत्तर म्हणून मिळतात. याचा कारण बऱ्याच लोकांसाठी गाणे ऐकणे हा एक timepass किंवा करमणुक असते. त्यामुळे dedicated listening म्हणजे काय ते सांगावसं वाटलं.
माझ्या मते गाणे ऐकणे (किंवा अजून generalization करुन, कुठल्याही कलेचा आस्वाद घेणे) या गोष्टीचे दोन modes आहेत. एक आहे आनंदासाठी ऐकणं. ज्यामध्ये एकमेव निकष असा आहे की ते गाणं ऐकून 'छान' वाटलं पाहिजे. जसं एखादं फूल पाहून छान वाटतं, किंवा पावसात भिजून छान वाटतं, किंवा लहान मुलाचं हसणं बघून छान वाटतं. अशा वेळी आपण या आनंदाच्या कारणांची मीमांसा करत बसत नाही (काहीजण करतही असतील, करो बिचारे!), फक्त त्या गोष्टीचा आनंद घेतो. दुसरी गोष्ट आहे विश्लेषणात्मक आनंद (analytical pleasure) -ज्यामध्ये एखाद्या कलाप्रकाराची घडण कशी होत गेली आहे किंवा तो कलाप्रकार घडवतानाची कलाकाराची thought process समजावून घेणे.अर्थात प्रत्येक वेळेस ऐकताना analytical mode मधे ऐकणे माझ्यासाठी अशक्य गोष्ट आहे.
सुरूवातीला शास्त्रीय संगीत ऐकताना मला वाद्यसंगीत खूप आवडायचं आणि कंठसंगीत तेवढंसं आवडायचं नाही. जसजसं शास्रीय संगीत जास्त ऐकत गेलो, तसतसं कंठसंगीतातही रुची वाढु लागली. मग हळुहळू रागांच्या सुरावटी ओळखीच्या झाल्या. कुठल्यातरी चित्रपटसंगीतातल्या गाण्यात वापरलेला राग, भावसंगीतात वापरलेला राग ओळखू यायला लागला. काही रागांसाठी स्वतःचे अमूर्त models तयार झाले. मग हळुहळू बाकीच्या तांत्रिक बाबींशी ओळख होत गेली. मग एखादा रागाच्या अंतरंगात डोकवायची सवय लागली. एखादा राग आपल्याला समजतोय असं वाटावं आणि लगेच असा काही performance/recording ऐकण्यात यावा की आधीच्या सगळ्या findings चा पुन्हा विचार करण्याची गरज भासावी असं बऱ्याच वेळेस होतं.
शास्त्रीय संगीतात अनवट राग असा एक प्रकार आहे. जर राग त्याच्या अवघड रचनेमुळे समजण्यास सोपा नसेल आणि त्याचमुळे तो जास्त गायला जात नसेल तर त्याला अनवट राग म्हणतात. माझी अनवट रागाची व्याख्या जो राग मला समजत नाही तो अनवट अशी आहे. तर अशा अनवट रागांचा अभ्यास हा एक आनंदाचा मोठाच ठेवा आहे. याशिवाय घराणा पद्धतींचे गायन आणि त्यातील सौंदर्य, एकाच घराण्याचे दोन गायक, तसेच गुरू शिष्य यांच्या गायनातील साम्यस्थळे आणि फरक, एखाद्या गायकाची शैली, जोड तसाच मिश्र रागांची घडण आणि त्यातील त्या रागाच्या / बंदिशीच्या रचनाकर्त्याला अभिप्रेत असलेला सौंदर्यविचार या सगळ्या गोष्टी अगणित आनंदाचा ठेवा आहेत. कधीकधी वर सांगितलेल्या बऱ्याच गोष्टींची उलगड लवकर होत नाही. मग त्यावर विचार करत असताना कधीतरी अचानक साक्षात्कार झाल्यासारख्या काही गोष्टी स्पष्ट होतात त्यावेळेसचा आनंद तर केवळ शब्दात न सांगता येण्यासारखा. त्याचबरोबर हे कुणाला सांगता येत नसेल तर होणारे थोडेसे दुःखही त्याचाच भाग (हे कौस्तुभनेही इथे सांगितले आहे).
हे सगळे होत असताना आपल्या स्वतःच्या (सर्वार्थाने) लहानपणाची होणारी जाणीव आणि या कलेची भव्यता आयुष्यविषयक funde ही शिकवून जातात. मला तर अत्युच्च आनंदाच्या आणि दुःखाच्या प्रसंगी गाण्यामुळे जी मदत झालीय त्यामुळे मी या कलाकारांच्या आणि संगीताच्या न फिटल्या जाणाऱ्या ऋणात बांधला गेलोय.

Tuesday, April 8, 2008

अमोना रे

परवा संध्याकाळी कुमारांचा दुर्गा ऐकत होतो. हा दुर्गा आधीही बऱ्याच वेळेस ऐकलेला आहे. मित्राने त्याच बंदिशीची एक concert recording दिली होती म्हणून नवीन उत्साहाने ऐकत होतो. या रेकॉर्डिंगमध्ये कुमारांनी अमोना या शब्दाचा अर्थ 'अ मौना - मौन सोडलेला' असा सांगितला आणि सहज विचार केला की कुमारांनी मौन कधी पकडले असेल आणि ते का सोडले असेल? आयुष्यातील घटनांवर बंदिशी कुमारांनी बऱ्याच रचल्या आहेत. या घटना विशेष असतील किंवा सहज घडणाऱ्या असतील. उदाहरणार्थ - फेर आई मौरा अंबुआपे (बागेश्री) ही बंदिश त्यांनी पत्नी भानुमती निवर्तल्यावर तिची आठवण आल्यावर रचलेली आहे तर करन दे रे कछु लला रे (श्री) ही नातवाला खेळवताना रचलेली आहे.

अचानक मनात विचार आला की ज्या मौनाबद्दल कुमार बोलत आहेत ते मौन गाण्यातले तर नाही? कुमार त्यांच्या ऐन तारुण्यात काही वर्षे क्षयामुळे आजारी होते. डॉक्टरांनीत्यांना गायला मनाई केली होती. काही काळानंतर (अंदाजे ५-७ वर्षांनंतर) कुमारांनी पुन्हा गायला सुरूवात केली. माझ्या मते त्या वेळेच्या भावना कुमारांनी या बंदिशीत व्यक्त केल्या आहेत. ती बंदिश खालीलप्रमाणे :

अमोना रे अबु रे
बन गया मै का कहूं रे

सुरन के रंग सो
समझ लो मै का कहूं रे

अबु = अब, सुरन = सुर

मला भावलेला बंदिशीचा अर्थ :
खूप काळ गात नसल्यामुळे कुमारांनी त्याला मौनाची उपमा दिली आहे. गाणे पुन्हा गायला सुरू केल्यावर हे मौन सुटलेले आहे. मधल्या काळात कुमार गात नसले तरी चिंतन चालू होतेच. किंबहुना त्या काळात कुमारांनी जे चिंतन केले त्याचा परिणाम त्यांचे गाणे परिपक्व होण्यात दिसून आला. पण मधल्या काळातले चिंतन व्यक्त करता येत नसल्यामुळे किंवा प्रयोग करून बघता येत नसल्यामुळे त्यांच्यातल्या कलाकाराची अवस्था मौनाचे व्रत घेतलेल्या साधकाप्रमाणे असेल. अशा अवस्थेत असताना एक दिवस मौन सुटले आणि काय काय बोलु अशा स्थितीत कुमार आहेत.
त्यांच्यासारख्या सिद्धहस्त गायकाला भावना व्यक्त करण्यासारखे दुसरे माध्यम तरी कोणते असणार? म्हणुनच बंदिशीच्या अंतऱ्यात कुमार म्हणतात की माझे सुरच माझी भावना व्यक्त करत आहेत. यापलीकडे मी काय बोलणार? कुठल्याही कलाकारासाठी स्वतःची कला व्यक्त न करता येण्यासारखे दुःख नाही. साहजिकच गाणे गायची शक्ती पुन्हा प्राप्त झाल्यानंतर झालेला अतिशय आनंद कुमार या बंदिशीमध्ये सांगत आहेत.

शास्त्रीय संगीताच्या बाबतीत फार कमी वेळेस असं होतं की बंदिशीचा भाव गाण्यात तंतोतंत उतरतो (हे माझ्यापुरतं तरी खरं आहे). अशा फार कमी बंदिशीमध्ये मला या बंदिशीचा समावेश करावासा वाटतो.

मी फारसा आस्तिक माणूस नाही. त्यामुळे ब्लॉगची सुरूवात करताना श्रीगणेशा वगैरे न लिहीता करता कुमारांसारख्या श्रेष्ठ गायकाच्या एखाद्या बंदिशीने सुरूवात करता आली याचा मला आनंद आहे. मी लावलेला या बंदिशीचा अर्थ बरोबर / चूक किंवा अंशतः बरोबर असेल याची मला पूर्ण जाणीव आहे. तपशीलात काही चुका असण्याची शक्यता आहे. भारतीय शास्त्रीय संगीताचा आणि कवितांचा एक साधारण रसिक एवढीच माझी लायकी आहे. इथून पुढे जसे जमेल तसे गाण्यावर व कवितांवर लिहीण्याचा विचार आहे. तोअनियमित राहील याची मी पुरेपुर काळजी घेईन.