Thursday, December 24, 2009

आज फेरिले गोरी...

आज फेरिले गोरी रंग बसंती चीर
रुतुराज कोयलरिया कूके

रंग दे रंगा दे रंगरेजवा
रुतुराज कोयलरिया कूके

ही कुमारांची गौरी बसंत मधली अप्रतिम बंदिश आहे. सवयीने कुमारांच्या बंदिशीचे शब्द कळतात पण अर्थ बऱ्याच वेळेस लागत नाही. याही बंदिशीच्या वेळेस असंच झालं. यातलं बसंती चीर हे काय प्रकरण आहे कळालं नाही. रुतुराज या उल्लेखामुळे आणि कोकिळेच्या कूजनामुळे तसंच राग बसंताचा मिश्रराग आहे यामुळे बंदिश वसंत ऋतूवर आहे हे अगदीच सहज ओळखता येतं. रंगाचा उल्लेख आहे त्यामुळे कदाचित तिसऱ्या ओळीचाही अर्थ लावता आला असता. पण त्यातही कपडे (रंग टाकुन) रंगव असा आग्रह प्रियकराला नाही तर तो रंगरेजवाला (म्हणजे कपडे रंगवणाऱ्याला - रंगारी) आहे. त्यामुळे या उल्लेखाबद्दल कुतुहल निर्माण झालं.

गुगल बाबा मुळे संदर्भाचा शोध घेणं खूपच सोपं होउन बसलं आहे. फक्त थोडासा वेळ द्यायची तयारी हवी आणि थोडीशी खटपट करायला लागते. तर गुगल वर संदर्भ शोधले तर पहाडी होलीच्या संदर्भात खालील माहिती मिळाली. - "फाल्गुनच्या एकादशीला चीर बंधन असते. या दिवशी मंदिर किंवा गावप्रमुखाच्या घरासमोर खांब रोवून त्यावर अनेक रंगाचे कापड बांधले जाते. यादिवशी मंदिरात रंग खेळल्यानंतरच गाववासी रंग खेळायला सुरुवात करतात" .

या संदर्भामुळे बंदिशीचा संपूर्ण अर्थ कळाला. बंदिश आधीपासून माहिती होतीच पण आता एका नवीन dimension मध्ये बघता येते. एका शांत, रम्य अशा पहाडी खेड्यातील होळीचं चित्र डोळ्यापुढे येतं. कुमारांनी काय पाहून रचना केली असेल ते कळतं. एवढंच, बाकीचं ज्याचं त्याने (किंवा जिचं तिने) गाण्यातून शोधावं.

. संदर्भ एक - नवभारत टाईम्स मधला लेख

. संदर्भ दोन - कुमारांचा गौरी बसंत

Saturday, December 5, 2009

तू उषा होउन ये

मी निशेने ग्रस्त होता तू उषा होउन ये
कोरशी प्राजक्त वेणी कुंतली खोवून ये

या जगाच्या यातनांनी दृष्टी माझी कुंठिता
तू उद्याची स्वप्नसृष्टी लोचनी लेवून ये

जायबंदी आर्ष मूल्ये पाहुनी मी खंगता
दीपसा आरक्त त्यांचा तू टिळा लावून ये

संशयाच्या वायसांनी टोचता माझी धृती
क्षेम द्याया शाश्वताच्या चंदनी नाहून ये

सूर माझे क्षीण होता शब्द होता पारखे
पैंजणे श्रद्धांश्रुतींची तू पदी लेउन ये

- बा भ बोरकर

नुकतीच बोरकरांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात झाली आहे. ही कविता त्यांच्या अखेरच्या दिवसातील 'चिन्मयी' या कविता संग्रहातील आहे. कवितेतील काही शब्द संस्कृत किंवा प्राकृत मराठी आहेत पण ते कवितेचा आशय कळण्याच्या आड येत नाहीत. कविता कुठल्या स्त्रीरूपाला उद्देशून लिहिली असावी असा विचार ही कविता पहिल्यांदा वाचली तेव्हा मनात आला होता पण "कोरशी प्राजक्ता वेणी" आणि "पैंजणे श्रद्धाश्रुतींची" वरून ती प्रेयसीलाच उद्देशून लिहिली असावी हे कळाले.