Friday, January 15, 2010

काही घटना आणि काही (तिखट) प्रश्न

सतीश शेट्टी यांचं खून झाला. त्यामुळे काही लोकांना खूप फायदा होईल, बऱ्याच लोकांना काहीच फरक पडणार नाही. मी शेट्टी यांचे नाव पहिल्यांदा २ दिवसापूर्वीच वाचले पण त्यांच्याबद्दल जे लिहून आले त्यामुळे त्यांचे कार्य कळले. त्यांच्या कामाबद्दल, खुनाबद्दल, त्यामुळे उद्भवलेल्या प्रश्नाबद्दल वर्तमानपत्रात वाचायला मिळेलच, त्यामुळे अधिक काही सांगण्यासारखं माझ्याजवळ काही नाही. शरमलेल्या आणि संतापलेल्या मनाने त्यांना माझी श्रद्धांजली. जर शेट्टी यांच्या खुनाने काहीच वाटत नसेल तर आपले मन समाजाप्रती आणि एकूणच कोडगे बनत चाललं आहे हे स्वत:शी मान्य करण्याचा प्रामाणिकपणा आपल्याकडे आहे?

दुसरी श्रद्धांजली गेल्या काही दिवसात आत्महत्या केलेल्या अनेक जीवांना. विशेष करून त्यातल्या लहान मुलांना. ज्या वयात आशावादाने मन भरलेलं असावं त्या वयात ही मुलं असं काय करताहेत? यातले बहुतेक जण हे परीक्षा पद्धतीचे किंवा reality शोज चे बळी आहेत. लहान मुलांचे reality शोज बघणारे या आत्महत्येप्रती स्वत:ची अल्पस्वल्प (नैतिक) जबाबदारी मान्य करतील?