Tuesday, April 6, 2010

बस नाम ही काफी है!

बेगम अख्तर ..
माझ्या पिढीत बेगम अख्तर ऐकणारे अणि त्यांचे रसिक असणारे फार लोक नाहीत. अख्तरीबाई हे एक व्यसन आहे. बोरकरांची एक कविता आहे - दंश या नावाची. त्या कवितेची सुरुवात आहे -
डसला मजला निळा भ्रमर सखी चढे निळी कावीळ
डोळ्यामधील काजळ देखील झाले गं घननीळ
असं सगळं निळं निळं झाल्याची अवस्था बोरकर त्यात सांगतात. अशी काहीतरी अवस्था ज्यांना अख्तरीबाईंच्या सुराचा दंश झाला आहे त्यांची होते.

माझ्या आवडत्या माणसांची पहिली भेट कशी आणि कधी झाली हे माझ्या बऱ्यापैकी लक्षात असतं. अख्तरीबाईंच्या सुराची पहिली भेटही लक्षात आहे. त्यांची पहिली ऐकलेली ठुमरी होती - बालमवा तुम क्या जानो प्रीत. पहिल्यांदाच ऐकतानाही त्या सुराची आर्तता मनाला भिडली. नंतर हळूहळू त्यांचं गाणं ऐकत गेलो आणि बहुतांश गाणी पहिल्यांदा ऐकली की एक खजिना सापडल्याचा आनंद व्हायचा; अजूनही होतो. All time favourites मध्ये अख्तरीबाई कधी समाविष्ट झाल्या ते कळलंसुद्धा नाही. अख्तरींचं गाणं हे रोज ऐकावं असं प्रकरण नाही. तो दंश व्हायला आणि पेलायला भावनांची intensity तेवढीच जास्त व्हावी लागते. पण ज्यावेळी अख्तरींच्या सुराची तहान लागते त्यावेळी दुसऱ्या कशानेही ती तहान भागत नाही.

साधारणत: अख्तरींचं गाणं हे दोन प्रमुख प्रकारांमध्ये विभागता येतं. एक त्यांची ठुमरी (किंवा दादरा, टप्पा, कजरी इ.) आणि दुसरी त्यांची गझल. त्यांची ठुमरी समजायला आणि आवडायला त्यामानाने सोपी आहे. थोडंफार ठुमरी गायन ऐकलं असेल तर अख्तरीबाईंची ठुमरी नक्कीच आनंद देईल. अगदीच नवखे असाल असाल तर मात्र अख्तरीबाईचं गाणं थोडंसं जड जाईल. ठुमरीपेक्षा त्यांची गझल appreciate करायला थोडी अवघड आहे. त्यांच्या गझला एकदम hardcore उर्दूमध्ये असतात, त्यामुळे उर्दू येत नसेल तर बऱ्याच वेळेस नेमका अर्थ लागत नाही, अंदाज बांधावा लागतो. पण अख्तरीबाईंच्या सुराची जादू अशी आहे की ते उर्दू शब्द कधीच टोचत नाहीत. ज्याप्रमाणे दिल से.. मधील चल छैय्या छैय्या हे गाणं अस्खलित उर्दू असूनही ते टोचत नाही अगदी त्याचप्रमाणे. उदाहरण द्यायचं झालं तर दिवाना बनाना है तो.. ही गझल किंवा तबियत इन दिनो... या गझलेचं देता येईल. एकदा या (आणि अशा) गझल सुरु झाल्या की सुरासोबत आपण नकळत वाहत जातो.

अख्तरीबाईंवर दोन तीन लेख वाचले आहेत. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार काही माहित नाही आणि जाणून घ्यावंसं वाटलं नाही. फक्त त्यांच्या आवाजात जी आर्तता आणि जो दर्द आहे त्याच्यामागे वैयक्तिक दु:ख असेल का असे कधीतरी वाटले होते. गझलमधला दर्द किंवा ठुमरी मधला शृंगार, विरह अख्तरीबाई ज्या पद्धतीने सादर करतात त्या दर्जाचं गाणं खूपच कमी जणांचं आहे. या संदर्भात सुनिताबाईंनी त्यांच्या मल्लिकार्जुन मन्सूर यांच्यावरच्या लेखात एक आठवण दिली आहे. त्यात मन्सूर असं म्हणतात की जर ५०-६० वर्षानंतर भारतीय संगीतातील कुठलं गाणं टिकून राहणार असेल तर ते बेगम अख्तर आणि बालगंधर्व यांचं असेल!

अख्तरीबाईंच्या गाण्यातील मला आवडलेल्या गोष्टी कुठल्या? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सुरांचा सच्चेपणा. असं सुरांचं सच्चेपण आणि नितळपण अख्तरीबाई सोडल्या तर मला ३-४ लोकांमध्येच दिसतं. वर उल्लेखल्याप्रमाणे गाण्यातील भाव दाखवण्याची क्षमता हा मला जाणवलेला दुसरा मुद्दा. तिसरी गोष्ट बऱ्याच लोकांनी लिहून ठेवली आहे आणि अख्तरीबाईंच्या गाण्याच्या प्रत्येक रसिकाला ती माहित असेल. मज पामराचा पण तो weak point आहे त्यामुळे त्याचा उल्लेख केल्याशिवाय राहवत नाही. गाणं गाताना मध्येच त्यांचा स्वर फाटतो किंवा थांबतो किंवा choke होतो. तशी ही गोष्ट निर्दोष गाण्याच्या दृष्टीने दुर्गुणच म्हटली पाहिजे पण त्यांच्या गाण्यात ती जागा अशी सुंदर वाटत राहते की बस. एकदा तशी जागा येऊन गेली की नकळत वाट बघत राहतो की पुन्हा ती जागा कधी येते आहे. ते स्वराचे choke होणं ऐकून जर तुमची heartbit miss होत नसेल तर आपली गाण्यातली wavelength जुळायला वेळ आहे असं मी म्हणेन.

अख्तरीबाईंच्या काही गाण्यावर वेगळे लेख लिहिता येतील एवढी ती गझल/ ठुमरी सुंदर आहेत. त्यांची बंगाली गाणी सुद्धा अशक्य सुंदर आहेत. तुम्हालाही अख्तरीबाईंच्या सुराचा दंश होवो अशी शुभेच्छा देऊन लेख संपवतो.