दुसरी श्रद्धांजली गेल्या काही दिवसात आत्महत्या केलेल्या अनेक जीवांना. विशेष करून त्यातल्या लहान मुलांना. ज्या वयात आशावादाने मन भरलेलं असावं त्या वयात ही मुलं असं काय करताहेत? यातले बहुतेक जण हे परीक्षा पद्धतीचे किंवा reality शोज चे बळी आहेत. लहान मुलांचे reality शोज बघणारे या आत्महत्येप्रती स्वत:ची अल्पस्वल्प (नैतिक) जबाबदारी मान्य करतील?
Friday, January 15, 2010
काही घटना आणि काही (तिखट) प्रश्न
दुसरी श्रद्धांजली गेल्या काही दिवसात आत्महत्या केलेल्या अनेक जीवांना. विशेष करून त्यातल्या लहान मुलांना. ज्या वयात आशावादाने मन भरलेलं असावं त्या वयात ही मुलं असं काय करताहेत? यातले बहुतेक जण हे परीक्षा पद्धतीचे किंवा reality शोज चे बळी आहेत. लहान मुलांचे reality शोज बघणारे या आत्महत्येप्रती स्वत:ची अल्पस्वल्प (नैतिक) जबाबदारी मान्य करतील?
Thursday, December 24, 2009
आज फेरिले गोरी...
रंग दे रंगा दे ओ रंगरेजवा
या संदर्भामुळे बंदिशीचा संपूर्ण अर्थ कळाला. बंदिश आधीपासून माहिती होतीच पण आता एका नवीन dimension मध्ये बघता येते. एका शांत, रम्य अशा पहाडी खेड्यातील होळीचं चित्र डोळ्यापुढे येतं. कुमारांनी काय पाहून रचना केली असेल ते कळतं. एवढंच, बाकीचं ज्याचं त्याने (किंवा जिचं तिने) गाण्यातून शोधावं.
१. संदर्भ एक - नवभारत टाईम्स मधला लेख
२. संदर्भ दोन - कुमारांचा गौरी बसंत
Saturday, December 5, 2009
तू उषा होउन ये
कोरशी प्राजक्त वेणी कुंतली खोवून ये
या जगाच्या यातनांनी दृष्टी माझी कुंठिता
तू उद्याची स्वप्नसृष्टी लोचनी लेवून ये
जायबंदी आर्ष मूल्ये पाहुनी मी खंगता
दीपसा आरक्त त्यांचा तू टिळा लावून ये
संशयाच्या वायसांनी टोचता माझी धृती
क्षेम द्याया शाश्वताच्या चंदनी नाहून ये
सूर माझे क्षीण होता शब्द होता पारखे
पैंजणे श्रद्धांश्रुतींची तू पदी लेउन ये
- बा भ बोरकर
नुकतीच बोरकरांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात झाली आहे. ही कविता त्यांच्या अखेरच्या दिवसातील 'चिन्मयी' या कविता संग्रहातील आहे. कवितेतील काही शब्द संस्कृत किंवा प्राकृत मराठी आहेत पण ते कवितेचा आशय कळण्याच्या आड येत नाहीत. कविता कुठल्या स्त्रीरूपाला उद्देशून लिहिली असावी असा विचार ही कविता पहिल्यांदा वाचली तेव्हा मनात आला होता पण "कोरशी प्राजक्ता वेणी" आणि "पैंजणे श्रद्धाश्रुतींची" वरून ती प्रेयसीलाच उद्देशून लिहिली असावी हे कळाले.
Thursday, September 17, 2009
संवेदनशीलता - तीन संदर्भ
भीगा भीगा सा क्यूं है ये अखबार
अपने हाकरको कल से चेंज करो
पॉंच सौ गाव बह गए इस साल
कवी गुलजार यांची एक त्रिवेणी. सकाळी सकाळी गरम चहासोबत पेपर हातात घ्यावा तर हे काय? पेपर एवढा का भिजलाय? पेपरवाल्याला नीट पेपर टाकता येत नाही का? हा पेपरवाला बदलून टाकूया. आणि “पावसाच्या पुरात पाचशे गावे वाहून गेली!” ही बातमी.
जो वाचतोय त्याच्या अर्थाने ही केवळ बातमी आहे. त्यामुळे तिथे पाचशे छापून आलं काय, तीनशे आलं काय, आणि सातशे आलं काय; त्याच्यासाठी (किंवा तिच्यासाठी) तो फक्त एक आकडा आहे. एक गाव वाहून जाणं म्हणजे काय याचा अंदाज त्याला बसल्याबसल्या येणं शक्य. त्यामुळेच तो पेपरवाल्याला बदलून टाकण्याची भाषा करू शकतो.
तो पेपरवाला बहुतांशी गरीब परिस्थितीतीलच असेल. गरीबी आणि बेकारीमुळे शहरात स्थलांतरित झाला असेल. कदाचित त्याचं गावही पुरामुळे धोक्यात आलं असेल. अशा वेळी त्याला क्षेमकुशल विचारणं तर दूरच पण माझा पेपर भिजलेला कसा? कुणाचं काहीही होवो, माझं सगळं व्यवस्थित असलं पाहिजे. दुर्दैव असं की, या व्यक्तीला नवीन पेपरवाला मिळेलही. कारण ती जागा घेण्यासाठी बेकारांचे आणि स्थलांतरितांचे तांडे उपलब्ध आहेतच.
शहरी जीवनातून अपरिहार्यपणे जगण्यात येणारी स्वकेंद्रित मानसिकता वरच्या त्रिवेणीतून फार चांगल्या रीतीने व्यक्त होते. शहरी जीवनातील कोरडेपणा आणि अलिप्तपणा या त्रिवेणीतून फार चांगला व्यक्त झालाय. हा कोरडेपणा दाखवण्यासाठी गुलजार यांनी पावसाच्या ओलीचा विरोधाभासी संदर्भ गुलजार यांनी किती समर्पकपणे (कदाचित अजाणतेपणी) वापरलाय.
दुसरा संदर्भ बोक्या सातबंडे या दिलीप प्रभावळकरांच्या पुस्तकातील. बोक्याच्या कथा प्रभावळकरांनी फारच सुंदर लिहील्या आहेत. मला बहुतेक कथा आवडल्या. बोक्याचा खोडकरपणा, चलाखपणा आवडला. एक गोष्ट मात्र खटकली. ती संवेदनशीलतेशी निगडित असल्यामुळे त्याचा उल्लेख करावासा वाटतो.
बोक्या मुंबईला राहतो. आगंतुक पाहुणा या गोष्टीत बोक्याच्या घरी एक अ-मुंबईकर आगंतुक पाहुणे येतात. त्या पाहुण्यांना वागायची रीतभात नसते. त्यात बोक्याच्या वडिलांनी सुट्टीची आखणी केलेली असते. हे पाहुणे आल्यामुळे बोक्याची आणि त्याच्या कुटुंबियांची एक सुटी वाया जायची शक्यता निर्माण होते. बोक्या आपल्या सुपीक डोक्याने आणि गनिमी काव्याने पाहुण्यांना पळवून लावतो. वरवर पाहिली तर कथा छान आहे, विनोदी आहे, ज्यांना वागण्याची रीतभात नाही त्यांना अद्दल घडवणारी आहे.
ज्याला आजकाल सुट्टी म्हणतात (weekend किंवा outing सारख्या) तशा सुट्ट्या मी फारशा अनुभवलेल्या नाहीत. माझ्या लेखी सुट्टी म्हणजे नातेवाईकांच्या गावाला जाणे व तिथे (घरगुती) मौजमजा करणे. पाहुणे (जवळचे आणि दूरचे) येण्यातला आणि त्यांच्याकडे जाण्यातला आनंद मी पुरेपूर उपभोगला आहे. माझ्या भागात (किमानपक्षी नातेवाईकांत आणि शेजारपाजाऱ्यांत तरी) केवळ मुलंच नाही तर मोठी माणसेही अगदी उत्साहाने पाहुणचार करतात (किंवा करायची). त्यामुळे ही कथा मला कुठेतरी टोचली.
पाहुणे खरंच इतके वाईट असतात का? त्यातले कोणीही शिष्टाचाराला एवढे पारखे असतात? समजा एखाद्या चांगल्या नातेवाईकांसाठी गेली आपली एखादी सुट्टी, तर त्यात काहीच आनंद नसतो का? त्या गोष्टीत जसे पाहुणे आहेत ते अगदी टोकाचे म्हणता येतील. अशा पाहुण्यांना पळवून लावणंच इष्ट ठरेल. मला चिंता वाटली ती बोक्याच्या वयाची मुलं ही कथा वाचतील आणि त्यातला कुठला भाग त्यांच्या सर्वाधिक स्मरणात राहील (किंवा गोष्टीचं take-away काय असेल)? जर टाळण्यासारखे पाहुणे असतील तर ही मुलं त्यांना टाळायला शिकतीलच. नाही शिकली तर त्यांना शिकवायला घरोघरचे आईबाप समर्थ आहेत. पण अशा गोष्टींतून पोचणारा संदेश चांगला असावा असे मला वाटते. या गोष्टीत पुन्हा स्वकेंद्रितची झाक दिसली म्हणून हा लेखनाचा खटाटोप.
तिसरा संदर्भ कविवर्य कुसुमाग्रजांच्या एका बालकवितेतील. ती कविता खाली देत आहे. या कवितेवर वेगळे स्पष्टीकरण द्यायची मला गरज वाटत नाही पण काहीजणांचा असा आक्षेप असू शकेल की लहान मुलांच्या कोवळ्या मनावर (जी कोवळी मनं GTK, Roadrash, NFS सारखे हिंस्त्र गेम खेळू शकतात, विकृत टीव्ही सिरीयल्स बघू शकतात) वाईट परिणाम होईल. यावर उत्तर म्हणून विनोबा भाव्यांच्या शिक्षण विचार या पुस्तकातील एक विचार इथे मांडतो. मुलांना जगतानाच जगण्यातील जबाबदारीची ओळख व्हायला हवी हे सांगताना विनोबा म्हणतात - “पुष्कळांची अशी समजूत आहे की लहानपणापासून जीवनाच्या जबाबदारीचे भान जर मुलाला राहील तर त्याचे जीवन कोमेजून जाईल. पण जीवनाच्या जबाबदारीचे भान असण्याने जर जीवन करपून जात असेल तर जीवन ही वस्तु जगण्याच्या लायकीचीच नाही असे म्हणावे लागेल.”
कुसुमाग्रजांची कविता -
चांदोबा चांदोबा
चांदोबा चांदोबा
रुसलास का?
- हो रुसलो.
लिंबोणीच्या झाडाखाली
लपलास का?
- हो लपलो.
चांदोबा चांदोबा
का रुसलात?
का लपलात?
तुमच्याच गावी
काल पाहिली
तीन बालके गोजिरवाणी
पायपथावर अन्नावाचून
तडफडणारी
पहाटरात्री वस्त्रावाचून
गोठविणाऱ्या थंडीमध्ये
कुडकुडणारी,
आज पाहिली
त्याच ठिकाणी
तीन मुले ती
परंतु त्यांची जीवनज्योती
विझली होती.
अशा अमानुष गावासाठी
का उजळावे,
जिथे न करूणा
वा माणूसपण
तिथे कशाला
मम अमृतकण
मी उधळावे?
म्हणून येथे दूर असा मी
बसलो आहे
लिंबोणीच्या झाडामागे
दडलो आहे.
Wednesday, September 16, 2009
मी माझा
१. छंद – टीव्ही बघणे, कॉम्प्युटर गेम खेळणे
२. मराठीतले आवडते लेखक – पु.ल. देशपांडे, व.पु. काळे, प्रवीण दवणे
३. इंग्रजीमधले आवडते लेखक – Dan Brown
४. आवडता कवी – संदीप खरे
५. आवडता मराठी संगीतकार – सलील कुलकर्णी
६. आवडता खेळ – २०-२० क्रिकेट
७. आवडता पासटाईम – मल्टिप्लेक्सला सिनेमा बघणे, मॉलमध्ये भटकणे
८. आवडती पार्श्वगायिका – अलका याज्ञिक
९. आवडता पार्श्वगायक – सोनु निगम, उदित नारायण
१०. आवडते भारतीय शास्त्रीय संगीत – पं.जसराज, पं. हरिप्रसाद चौरासिया, पं. शिवकुमार शर्मा
११. आवडता जुना गायक – किशोर कुमार
१२. आवडता चित्रपट दिग्दर्शक – अब्बास मस्तान, करन जोहर (अजुन कोण बरं?)
१३. माझा व्यवसाय – सॉफ्टवेअर इंजिनीअर (किंवा तत्सम)
१४. आवडता ट्रेक – सिंहगड
१५. आवडते पर्यटन स्थळ – गोवा
१६. आवडते वर्तमानपत्र – महाराष्ट्र टाईम्स (तेही ऑनलाईन)
१७. माझे आवडते घोषवाक्य – समझदार को ईशारा काफी.
Monday, September 14, 2009
समीक्षक वृत्ती
समीक्षेच्या संदर्भात आज एक चांगला परिच्छेद वाचण्यात आला. तो देण्याआधी थोडेसे –
समीक्षा म्हणजे काय हे मला नक्की सांगता येणार नाही परंतु मराठीतलं समीक्षात्मक लिखाण मी थोडंफार वाचलंय. त्यावरून मी असा अंदाज करू शकतो की एखादा लेख/पुस्तक वाचताना जर कुठे काही अडलं (एखादा शब्द, शब्दांचा अर्थ किंवा काही संदर्भ) तर त्याचा पाठपुरावा करणं, कळालेली गोष्ट वेगवेगळ्या निकषांवर तपासून घेणे म्हणजे समीक्षक वृत्ती. समीक्षक ही व्यक्ती रसिक तर असतेच पण तिच्यात अभ्यासक वृत्तीही असते. काही लोकांना समीक्षा म्हणजे काथ्याकूट असं जरी वाटत असलं तरी कलाकृती समजून घेण्यास चांगली समीक्षा खूपच मदत करते.
म. वा. धोंड हे एक श्रेष्ठ समीक्षक. त्यांची तीन पुस्तके वाचली आहेत आणि त्यांचे लिखाण मला आवडते. त्यांचे ’तरीही येतो वास फुलांना’ हे बा. सी. मर्ढेकरांच्या कवितांवरचे पुस्तक वाचले आणि मला मर्ढेकरांच्या कवितांमध्ये रस निर्माण झाला. आणि त्यांच्या या/इतर पुस्तकांनी मला त्या-त्या विषयामध्ये रस निर्माण झाला आहे किंवा वाढला आहे. धोंडांवर या महिन्याच्या (सप्टेंबर २००९) अंतर्नाद मध्ये किशोर आरस यांनी एक लेख लिहीला आहे. त्या लेखातील परिच्छेद खाली लिहीतो आहे. हा परिच्छेद समीक्षक वृत्तीसंबंधी आहे आणि समीक्षकाची अभ्यासक वृत्ती, त्याला अर्थ लागत नसल्यामुळे जाणवणारी अस्वस्थता आणि अर्थ मिळाल्या नंतरचा आनंद यातून दिसतो.
============================================
पैं हींवराची दाट साऊली । सज्जनी जैसी वालिली ।
तैसिं पुण्ये डावलूनी गेली । अभक्तांते ॥
या ज्ञानेश्वरीतील ओवीने त्यांना (धोंडांना) अडवले. ओवीचा उत्तरार्ध सहज कळला, पण पूर्वार्ध नीट उमजेना. हिवराची सावली चांगली दाट असूनही सज्जन ती टाळतात, त्याअर्थी त्यात दुर्जनाकरिता काहीतरी ’गंमत’ नक्कीच असली पाहिजे. ती कोणती?
धोंडांना चुटपुट लागून राहिली. हिवर पूर्ण अपरिचित, म्हणून शब्दकोश व ज्ञानेश्वरीचे निघंटू पाहिले. शिवाजीराव भावे यांचा ’ज्ञानेश्वरी कोश’ न्याहाळला. समाधान होईना. मग ते वनस्पतिशास्त्राच्या प्राध्यापकांना भेटले. प्रा. धोंड म्हणतात, ’ते तर बिचारे माझ्याहूनही निष्पाप! त्यांना हिवराची सावली टाळायची असते हे तर ठाऊक नव्हतेच, पण हिवरही ठाऊक नव्हता.’ या काळात प्रा. धोंड आमच्या ’साहित्यसहवास’मध्ये लावलेल्या असंख्य झाडांकडे तासनतास टक लावून पाहत उभे असल्याचे दृश्य सर्व रहिवाशांना दिसत असे. पुढे नागपूर विद्यापीठात ते काही कामाकरिता गेले असता १८ वर्षे वयाच्या एका मुलाने हिवराचे झाड त्यांना दाखवले. ’अकॅशिया ल्यूकोफ्लॉइआ’ हे हिवराचे लॅटिन नाव असल्याचे त्यांना समजले. हिवर भेटला, पण त्याच्या सावलीला सज्जन का बसत नाहीत, हे कळले नाही. पुन्हा एकदा ते ग्रंथाला शरण गेले. जॉर्ज वॅटचा ’डिक्शनरी ऑफ इकॉनॉमिक प्रॉडक्टस ऑफ इंडिया’ हा बृहद ग्रंथ पाहत असताना ’हिवराची साल दारूकरता तयार केलेल्या रसायनात घातली तर ते लवकर फसफसते, त्यातील गाळ खाली बसातो आणि त्याला चांगला स्वाद येतो. म्हणून हिवराला ’शराब की कीकर’ असेही नाव आहे हे कळून आले आणि ’सज्जन’ हिवराच्या सावलीला का बसत नाहीत, याचा तत्काळ उलगडा झाला.
Tuesday, July 28, 2009
वर्तुळ
बागेश्री हा विरहरसप्रधान राग आहे असं वाचलेलं/ऐकलेलं आहे. मलापण बागेश्रीतील विरहरस जाणवतो. इतर वेळी, बागेश्री ऐकून अगदी थोडंसं अस्वस्थ व्हायला होतं. आज मात्र अगदी अनपेक्षित परिणाम घडला. जसजसा ती रेकॉर्डिंग ऐकत गेलो, तसतसं अस्वस्थता हळूहळू दूर होत गेली. मनात शांतता पसरायला लागली. रेकॉर्डिंग जेव्हा संपली तेव्हा मी पूर्ण normal ला होतो. अगदी अलगदपणे हा परिणाम घडला.
राग आणि रागातून व्यक्त होणाऱ्या भावनांचं वर्तुळ पूर्ण झालं.